
तरुणांच्या रोजच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीने केली आत्महत्या
बारामती:- तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथील चार तरुणांनी शाळकरी मुलीला तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने कोऱ्हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे.
याबाबतची सविस्तर हकिकत अशी की,१५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच कोऱ्हाळे गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता.मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता.चारही आरोपी शस्त्राचा धाक दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती.
सात एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती.आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०७,७८,२९६,३५२, ३५१ तसेच बालकांचे लैंगिक अपराधा पासून संरक्षण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड हे करीत आहेत.